
प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. २८ जुलै, २०२६
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना स्वामीभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी व सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले असून, हजारो स्वामीभक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडणार आहे.
मंडळाच्या नवीन वाहनतळ शेड परिसरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत विविध दिंड्या, पारंपरिक वाद्यांचा गजर, मुंबईच्या स्वरांजली बँडपथकाचे सादरीकरण, विजुभाई तांडेल यांच्या आराध्य ढोलपथकाचा दमदार निनाद तसेच अमोलराजे लेझीम संघाच्या आकर्षक सादरीकरणामुळे संपूर्ण अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
या पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ आमदार शेखर निकम, भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार, नगरसेवक अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नितीन हबीब, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, शिक्षण सभापती संकेत पिसे, मुंबईचे नगरसेवक विजु तांडेल, देणगीदार सायन संतोष नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाचे आयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले करणार आहेत.
दरम्यान, गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त २७ ते २९ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने भाविक रक्तदानासाठी पुढे सरसावत असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, श्री स्वामी समर्थांचे दर्शन, महाप्रसाद तसेच सेवा उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम वेळेवर पार पडणार असल्याने भाविकांनी वेळेत उपस्थित राहून श्री स्वामींच्या दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे.














