
प्रतिनिधी-औराद,
औराद मंडळाचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री. एम. एस. सरकाझी यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून काही वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि इतर प्रसारमाध्यमांतून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तथ्य समोर आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली असता सरकाझी हे नियोजित दिवशी मुख्यालयात उपस्थित राहून नागरिकांची विविध महसुली कामे वेळेत व नियमानुसार करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. निराधार योजनांची चौकशी, रस्ते ताबा प्रकरणे, दुरुस्तीची कामे, विनापरवाना वाळू व मुरूम उत्खनन तसेच वाहतुकीविरुद्ध दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करणे, जमिनींची खरेदी-विक्री, हक्कसोड, बक्षीसपत्र, बोजा चढविणे-कमी करणे व वाटपाच्या नोंदी अशा विविध कामांमध्ये त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.याशिवाय सप्टेंबर २०२५ मध्ये सिना नदीला आलेल्या पुरादरम्यान सरकारी मदत पोहोचण्यास विलंब होत असताना सरकाझी यांनी स्वतःच्या खर्चातून पूरग्रस्तांसाठी अन्नाची व्यवस्था केली. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य उभे. केले. तत्कालीन तहसीलदार, मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) यांच्या समवेत पूरग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी, धान्य व इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पूरस्थितीत सलग आठ ते दहा दिवस मुख्यालयात मुक्काम करून नागरिकांच्या सेवेसाठी कार्य केल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान, काही प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या महसुली नोंदी रद्द झाल्याच्या वृत्ताबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही नोंदी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाल्या असून, काही प्रकरणांमध्ये इतर हक्कातील बोजा असल्याने नियमांनुसार व्यवहार मंजूर करणे शक्य नव्हते. संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार कार्यवाही करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर कोणतेही ठोस पुरावे न देता मंडळ अधिकाऱ्यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत प्रतिक्रिया देताना प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “लोकसेवेसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. अशा प्रकारच्या बदनामीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. अन्यथा जनतेच्या पाठिंब्याने व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.”













