
अंत्रोळी (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात शिक्षक श्रीरंग बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा आढावा घेत त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लोकनाट्ये तसेच सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या साहित्यिक योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या साहित्याने वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या जीवनाला दिलेला आवाज, सामाजिक समतेचा संदेश आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड यांच्यासह श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड आणि पुष्पा बनसोडे हे शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर कीर्ती जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले.













