
प्रतिनिधी- सोलापूर,
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पालखीच्या स्वागतासाठी प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत आगळावेगळा आदर्श निर्माण केला. टाळ-मृदंगाच्या गजरात, “गण गण गणात बोते” आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.पालखीचे स्वागत करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची उधळण, रांगोळ्या, भगवे ध्वज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. अधिकारी व पदाधिकारी यांनी डोक्यावर फेटा, अंगात पांढरे पारंपरिक वस्त्र आणि गळ्यात तुळशीची माळ परिधान करून वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेऊन श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. वारकरी परंपरा ही समाजात समता, बंधुभाव, सेवा आणि आध्यात्मिक मूल्ये रुजविणारी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पालखी सोहळ्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत दर्शनाचा लाभ घेतला.
पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षा यांसाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनीही वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालखीचे स्वागत केले. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अभिवादन करत अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवल्याने हा सोहळा भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.















