
प्रतिनिधी -पंढरपूर
आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. यावेळी आषाढी यात्रेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाच्या विविध उपक्रमांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करताना, ‘चरणसेवा’ उपक्रमातून डॉक्टर, स्वयंसेवक आणि युवकांनी वारकऱ्यांसाठी केलेली निस्वार्थ सेवा ही महाराष्ट्राच्या युवा शक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडवणारी असल्याचे गौरवोद्गार काढले.पंढरपूर पंचायत समिती येथे झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारी ही राज्याची सांस्कृतिक ओळख असून लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने उत्कृष्ट कार्य केले आहे.यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३० ते ३५ लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, स्नानगृहे, विश्रांती केंद्रे, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमातून हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार आणि औषधोपचाराचा लाभ मिळाला.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मनोगतात आषाढी यात्रेच्या नियोजनात, स्वच्छता व्यवस्थापनात, वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात तसेच सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेचे विशेष कौतुक केले. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वारी घडविण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ या उपक्रमांची माहिती देणारी चित्रफीत सादर करण्यात आली. तसेच विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, स्वच्छता कर्मचारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यंदाची आषाढी वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर स्वच्छता, सेवा, समन्वय आणि युवा सहभागाचा आदर्श ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वारीचा अनुभव मिळाल्याचे समाधानही यावेळी व्यक्त करण्यात आले.
















