ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना नवे व्यासपीठ; उत्कृष्ट खेळाडू घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

प्रतिनिधी – अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३९ वर्षांत धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कार्यात आणखी एक मानाचा तुरा रोवत गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर **‘अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी’**चे भव्य लोकार्पण करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरतशेठ गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी, “ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, यासाठी ही अॅकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावेल. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने क्रीडा क्षेत्रात टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद असून शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल,” असे सांगितले.

कार्यक्रमास आमदार शेखर निकम, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री शिवाजीराव पाटील, माजी नगराध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे, मिलन कल्याणशेट्टी, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, संदीप फुगे यांच्यासह माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक समीर दिघे, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, रणजी ट्रॉफी निवड समिती सदस्य संजय पाटील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ना. गोगावले यांनी आपल्या भाषणात श्री क्षेत्र अक्कलकोटच्या धार्मिक वैभवासोबतच सामाजिक व क्रीडा विकासासाठी न्यासाने केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकासकामांचाही गौरव केला.

ग्रामीण खेळाडूंना सुवर्णसंधी
माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक समीर दिघे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा व दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे मोठे काम या अॅकॅडमीच्या माध्यमातून होणार आहे. येथून भविष्यात आयपीएल, रणजी तसेच भारतीय संघासाठी खेळाडू घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रणजी ट्रॉफीचे निवडकर्ता संजय पाटील यांनी सांगितले की, शेगावनंतर अक्कलकोटमध्ये अशा प्रकारची आधुनिक क्रिकेट अॅकॅडमी उभारली गेली असून, पूर्वी महानगरांपुरत्या मर्यादित असलेल्या सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध होत आहेत. याचा निश्चितच नवोदित खेळाडूंना मोठा लाभ होईल.
मान्यवरांचा सत्कार आणि देणगी जाहीर
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक कोरीव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पै. महेंद्र गायकवाड यांना १ लाख रुपये, तर पै. काकासाहेब पवार आणि पै. धनराज भुजबळ यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.
अॅकॅडमीचे काम वेळेत आणि उत्कृष्टरीत्या पूर्ण केल्याबद्दल न्यासाचे सचिव शामराव मोरे यांचा ना. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अॅकॅडमीचे प्रशिक्षक मल्लिकार्जुन कोळी यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास न्यासाचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रिकेटपटू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी केले, तर आभार अरविंद शिंदे यांनी मानले.
ग्रामीण भागासाठी नवी क्रीडा क्रांती
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीमुळे अक्कलकोटसह ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आधुनिक सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. या अॅकॅडमीतून भविष्यात आयपीएल, रणजी ट्रॉफी आणि भारतीय संघासाठी खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा समीर दिघे आणि संजय पाटील यांनी व्यक्त केली.
टर्फ संस्कृतीचा ग्रामीण भागात विस्तार
महाराष्ट्रातील क्रिकेट संस्कृती झपाट्याने बदलत असून, एकेकाळी मुंबई-पुण्यासारख्या शहरांपुरते मर्यादित असलेले टर्फ क्रिकेट आता अक्कलकोटसारख्या तालुक्यांपर्यंत पोहोचले आहे. कोविडनंतर वाढलेल्या आरोग्य जागृतीमुळे टर्फ संस्कृती ही केवळ खेळापुरती मर्यादित न राहता फिटनेस आणि आधुनिक क्रीडा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. अक्कलकोटमधील ही अॅकॅडमी ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
















