प्रतिनिधी-सोलापूर,
आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण सोहळ्याच्या स्थळांचा संयुक्त पाहणी दौरा करून तयारीचा आढावा घेतला.सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला. शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अमृता वाघे यांनीही प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन तयारीची पाहणी केली.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एस. व्ही. कुलकर्णी, माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा परिषद सदस्य धनाजी जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मपुरी ते वाखरीपर्यंत सूक्ष्म पाहणी-
सकाळी ९ वाजता माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथून पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. धर्मपुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा तळ, पुरदावडे व खुडूस येथील प्रसिद्ध गोल रिंगण स्थळ तसेच पुरदावडे प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर पाहणी करण्यात आली.वेळापूर येथील पालखी मुक्काम तळावर वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जर्मन हँगर शौचालये व स्नानगृहांची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. तसेच बोंडले येथील श्री चांगा वटेश्वर महाराज पालखी तळ, बोरगाव व पिराची कुरोली येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळ, भंडीशेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी तळ तसेच पंढरपूरजवळील वाखरी येथील भव्य गोल रिंगण स्थळाची पाहणी करून अंतिम तयारीचा आढावा घेण्यात आला.पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर विशेष लक्षवारी काळात लाखो भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या पाणी टँकर फीडिंग पॉइंट्सची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाणी वितरणाचे नियोजन, उपलब्धता आणि व्यवस्थापनाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
पर्यावरणपूरक वारी’चा संदेश-
वारी केवळ सुविधा-केंद्रित न राहता पर्यावरणपूरक व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाहणी दौऱ्यादरम्यान सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पालखी तळांवर वृक्षारोपण करण्यात आले. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
नियोजनबद्ध पाहणीमुळे पालखी-
मार्गावरील विविध विकासकामांना वेग आला असून, “पाऊले चालती पंढरीची” म्हणत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद पूर्णपणे सज्ज असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले.














