३,६५५ शाळांतील १ लाख २२ हजार १६७ विद्यार्थ्यांचा सहभाग; पर्यावरण, सामाजिक जाणीव आणि विकसित भारताची स्वप्ने लेखणीतून व्यक्त.
प्रतिनिधी -सोलापूर, दि. २३ जुलै,२०२६

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य, वैचारिक क्षमता, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील ३,६५५ शाळांमधील तब्बल १ लाख २२ हजार १६७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.ही स्पर्धा शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
स्पर्धा इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गटनिहाय घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व, माझे गाव–सुंदर गाव, सर्व जगाचा अन्नदाता–शेतकरी राजा, पाणी हेच जीवन, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज, आषाढी वारी आणि शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका या विषयांवर अभ्यासपूर्ण, वैचारिक आणि प्रभावी निबंध सादर करत आपल्या लेखन कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार घडविला.तालुकानिहाय अंतिम अहवालानुसार माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ४७६ शाळांचा, तर सांगोला तालुक्यात ४७१ शाळांचा सहभाग नोंदविण्यात आला. विद्यार्थी सहभागामध्ये अक्कलकोट तालुका १६,८१९ विद्यार्थ्यांसह प्रथम, सांगोला १५,१७७ विद्यार्थ्यांसह द्वितीय आणि माढा १५,४०० विद्यार्थ्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला.
ता
लुकानिहाय सहभाग पुढीलप्रमाणे आहे : बार्शी – ३६० शाळा (१०,५४२ विद्यार्थी), मंगळवेढा – २७० (१०,२४३), मोहोळ – २९३ (९,४६०), माढा – ३५१ (१५,४००), उत्तर सोलापूर – १२८ (५,७८८), पंढरपूर – ४१३ (९,५३७), करमाळा – २७६ (७,२५६), अक्कलकोट – ३३२ (१६,८१९), सांगोला – ४७१ (१५,१७७), माळशिरस – ४७६ (१३,४६९) आणि दक्षिण सोलापूर – २८५ शाळा (८,४७६ विद्यार्थी).
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना आणि विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच या उपक्रमाची खरी पावती आहे,” असे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. जिल्हाभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा आणि लेखन संस्कृतीला बळकटी देणारा ठरल्याची भावना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केली.















