
प्रतिनिधी -सोलापूर
आकांक्षित तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेली ३८ उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.जिल्हा परिषदेमार्फत नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुकानिहाय विविध विकास निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम, सांगोल्याचे सहायक गटविकास अधिकारी वसंत फुले, तसेच जिल्हास्तरीय विविध विभागांचे प्रमुख, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सीईओ कुशल जैन यांनी आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील निर्देशांकांचा सखोल आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.देशातील सर्वाधिक मागासलेल्या ५१३ तालुक्यांच्या तसेच महाराष्ट्रातील २७ तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा या कार्यक्रमात समावेश आहे.
नीती आयोगाच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये अक्कलकोट तालुक्याने तिसरे स्थान मिळविले असून सांगोला तालुका सातत्याने प्रगतीपथावर असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित ३८ निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात आहे.
बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून शासनाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये अक्कलकोट राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये अक्कलकोट तालुका तिसऱ्या क्रमांकावर असून सांगोला तालुका सातत्याने प्रगतीपथावर आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
















