देऊळबंद-२’च्या १०० कोटींच्या यशानिमित्त पुण्यात कृतज्ञता सोहळा; आशिष शेलार व प्रवीण तरडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

प्रतिनिधी-सोलापूर
अक्कलकोटचे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांच्या प्रचिती संकलनावर आधारित दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळबंद-२’ या भक्तिमय मराठी चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या दमदार संकल्पना व पटकथेला असून ‘देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल, असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.देऊळबंद-२’च्या १०० कोटींच्या यशानिमित्त पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्ड रिसॉर्ट येथे आयोजित ‘गोष्ट मोठी १०० कोटी’ या कृतज्ञता सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते मोहन जोशी, प्रथमेश इंगळे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवीण तरडे व मोहन जोशी यांच्या हस्ते मुरलीधर मोहोळ, आशिष शेलार, महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा श्री स्वामी समर्थांची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश इंगळे म्हणाले, “सुरुवातीला ‘देऊळबंद’ ही संकल्पना ऐकून वेगळी वाटली होती. मात्र प्रवीण तरडे यांनी चित्रपटाची कथा समजावून सांगितल्यानंतर त्यामागील विचार स्पष्ट झाला. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ‘देऊळबंद’च्या दोन्ही चित्रपटांना रसिक व स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या यशाचे श्रेय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासोबतच तमाम स्वामीभक्तांनाही जाते.”कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडे यांच्या कष्टाळू स्वभावाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रवीण तरडे यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करत, त्यांच्या माध्यमातून धर्म, संस्कृती आणि भक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले.
यावेळी अभिनेता प्रसाद ओक, क्षितीश दाते आणि ओम भूतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी योगदान दिल्याबद्दल लीड मीडियाचे विनोद सातव, अश्विनी तेरणीकर व त्यांच्या टीमचाही गौरव करण्यात आला.
चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी योगदान दिल्याबद्दल अतुल कुडले, रमेश परदेशी व विनोद वणवे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. कुशल कोंडे, अनुप गोरे आणि मंदार आडकर यांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांचे मानधन जाहीर करण्यात आले.
यावेळी प्रवीण तरडे यांनी ‘देऊळबंद-१’ आणि ‘देऊळबंद-२’च्या यशानंतर ‘देऊळबंद-३’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. “गुहागर ते अमेरिका” अशी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास राजेश पांडे, कैलाश वाणी, चाफळकर बंधू, अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, अभिजित खांडकेकर, हार्दिक जोशी, विजू माने, सलील कुलकर्णी, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, तुषार मोरे, अंकुश केत, स्वप्निल गायकवाड, दशरथ लोंढे, स्वामीनाथ मुसळे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.














